’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ४

सर्र्पटर्र्कर्रर्र
.
.
टर्र्पसर्र्कर्रर्र

श्रद्धा कपडे वाळत घालायची दांडी दोरीने वरखाली करून पाहात होती. तिला त्या एकंदर प्रकाराचाच प्रचंड अचंबा वाटत होता. कायकाय शोध लागतात एकेक. आपल्यावेळी हे असलं कधी नव्हतं काही. लहानपणी ती आणि निरू स्टुलावर उभं राहून दो-यांवर कपडे वाळत घालायचे ते तिला आठवलं.

दीड वाजला तरी तिचे कपडे वाळत घालून झाले नव्हते. सकाळी उठायला उशीर झाला होता. अलार्मरावांनी देखील डुलक्या काढायला आजचाच दिवस निवडला होता. त्यातच अनू-मनूचा बाबा त्यांच्या सहलीच्या परमिशन फ़ॉर्मवर सही करायला विसरला होता. फ़ॉर्मवर बाबाचीच सही हवी म्हणून अनू हटून बसली होती, त्याकरता ती बाईंचा ओरडाही खायला तयार होती. या सगळ्या ड्राम्यामध्ये रिक्षावाले काका हॉर्न वाजवून कंटाळून निघून गेले, मग तिला त्या दोघींना शाळेत सोडायला जायला लागलं. अनू हुप्प होती, ती हुप्प म्हणून मनू मिझरेबल दिसत होती. दिवस ऑलरेडी केराच्या टोपलीत जाणार असं दिसत होतं.

घरी पोहेचेतो आठ वाजले. आल्याआल्याच पवार काकूंनी कामाच्या बाई येणार नाहीत अशी वर्दी दिली. "पर्फ़ेक्ट!" श्रद्धाने मनात म्हटलं. आता कपडे, भांडी, जेवण या तिन्हीही आघाड्या तिलाच बघायच्या होत्या. तिने लिहीण्याचा विचार मनातून काढून टाकला. काल संध्याकाळी बीचवर जाऊन वाळूने माखलेले कपडे बाथरूममध्ये तिची वाट पाहात होते, ते तिने शेवटावर ढकलले आणि जेवण, भांडी, मग कपडे अशी प्रायोरिटी लिस्ट ठरवून घेतली.

सगळं आटपेस्तो दीड वाजत आले होते. मध्ये पवार काकू श्रद्धाची तारांबळ कशी उडालिये हे पाहायला आल्या होत्या, त्यांच्याकडून तिने पपई कापून घेतला. पण मनूला चौकोनी तुकडे आवडतात, तर अनूला पूर्णच्या पूर्ण बोटी- हे ती त्यांना सांगायला विसरली. ग्रेट! आता वाडगाभर चौकोनी पपई पाहून अनूचा मूड आणखी बूटात जाणार.

पण पपई खाताना अनूला ते लक्षातही आलं होतं असं दिसलं नाही. आज ती नको तितकी शांत होती, लक्ष कुठेतरी भलतीकडेच होतं. अनूची अखंड बडबड बंद आहे असं फ़क्त एकदा झालं होतं. एकदा रात्रीचं फ़िरायला म्हणून बाहेर पडलो होतो. तेव्हा, नियॉन्सच्या प्रकाशातली आपली सावली आपल्यापेक्षा फ़ास्ट पळते म्हणून तिला हरवण्यासाठी अनू तिच्याहून वेगाने पळत सुटली होती आणि नाक फ़ोडून घेतलं होतं. "तुम्ही मला थांबवलं का नाहीत? " म्हणून आम्हाला ती सायलण्ट ट्रीट्मेण्ट. पण आज आत्ता याबद्दल विचार करायला वेळ नव्हता. अजून कपडे व्हायचे होते.

"मी तुला मदत करू का?"
मागून किन-या आवाजात पृच्छा झाली.
श्रद्धा गालातल्या गालात हसली.
"या सखूताई, त्या वरच्या दांडीवरचा नॅपकिन हात लांब करून जरा सरळ करता का? माझा हातच पोहोचत नाहीये. तुमचा पोहोचतो का बघा जरा!"
"खुक्क"
मनू खुदकन नाही, तर खुक्ककन हसायची.
"बोला खुक्करसिंग, काय काम होतं? होमवर्क झालं?"
मनूने मान डोलावली.
"मग?"
थोडीशी घुटमळ आणि अम्म..उम्म नंतर..
"मजआ मळेतशा चहीका चरीत चलझा"
मनूला अनूबद्दल काही टेन्शन असेल तर ती थेट ’म’च्या भाषेत सुरू होते हे श्रद्धासकट अख्ख्या सोसायटीला, शाळेला, क्लबला आणि त्या सर्वसाक्षी, सर्वव्यापी स्पंजबॉब स्क्वेअरपॅंट्सला देखील  माहिती. त्यामुळे ते गुपित - गुपित नव्हतंच.
"मयका मलझा?"
त्यातून कळली ती गोष्ट काहीशी अशी होती-

अनू-मनूला दर सोमवारी आणि शुक्रवारी वाचनाचा तास असायचा. त्यांच्या बाई शुक्रवारी त्यांना एकेक पुस्तक घरी घेऊन जायला द्यायच्या आणि ते वाचून काय वाटलं, तुम्हाला ते आवडलं तर का आवडलं, नाही आवडलं तर का नाही आवडलं? हे ’इन ओन वर्ड्स’ लिहून आणायला सांगायच्या. अनूने लिहून आणलेलं राईट-अप वाचून त्यांनी अनूला "पेरेण्टकडून लिहून घेतलंस का?" "कशात पाहून लिहीलंस का?" असं विचारलं होतं. तिने नाही म्हटल्यावर तिला तिथेच बसवून पुन्हा लिहून काढायला सांगीतलं होतं.
आणि अनूला ते लिहीता आलं नव्हतं.

श्रद्धा थेट फ़्लॅशबॅकमध्ये. लायब्ररीचा तास, लायब्ररीचे पाटिल सर, आपण ’श्रीमान योगी’ बद्दल लिहीलं होतं.
त्यावेळी किती अपमान झाल्यासारखं वाटलेलं आपल्याला. पहिले भोकाड पसरून रडायला आलेलं आणि त्यानंतर दोन दिवस अश्रूंना खळ नव्ह्ता.
पण, अनू रडलेली दिसत नव्हती.

अनूची हिच गोष्ट श्रद्धाला खूप आवडायची. तिला फ़ार रडायला यायचं नाही. तिच्यावाटचा अश्रूंचा सगळा लॉट त्या दोघी जन्मताक्षणीच मनूकडे गेला होता. ती आणि मनू म्हणजे लहानपणीचे निरू आणि श्रद्धा.

"पण अनूने माझ्यासमोर लिहीलेलं ते. तिने कशातही बघून लिहीलं नाही ते. बाबाची शप्पथ."
मनू बोलत होती.
"मनस्विनी, अशा खुळ्यासारख्या शपथा घ्यायच्या नाहीत. आणि अनू म्हणतेय तर ते तिनं स्वत:च लिहीलं असणार हे मला माहितीये."
"अनू बाबाला कॉल करत होती. त्याचा फ़ोन पण लागत नाहीये"
आहे त्या सिच्युएशनबद्दल आपल्याला काही करता येत नाहीये हे कळून मनू किती गरीब बिचारी झाली होती.
"काय करतिये अनू?"
"कधीची झोपलिये."
"झोपू देत. ती उठेल तेव्हा पाहू आपण काय करायचं ते"

--

अनू थेट संध्याकाळी उठली. त्यानंतर ती होमवर्क करत बसली. खेळायला गेली नाही, टीव्ही लावला नाही, मनूच्या शेंड्या ओढून तिला घरभर पळायला लावून त्रास दिला नाही. फ़िशटॅंकमधल्या बोझोशी गप्पा केल्या नाहीत. एरव्ही श्रद्धाला घसा बसेपर्यंत ओरडत त्यांच्या पाठी धावावं लागायचं; आणि, आज तसं झालं नाही तर, चुकचुकल्यासारखं वाटत होतं.
मनू डोळ्याच्या कोप-यातून कधी तिच्याकडे आणि कधी माझ्याकडे "बघ, मी तुला सांगीतलं नव्ह्तं?" अशा अर्थाने बघत होती.
अशाच शांततेमध्ये संध्याकाळ सरली, उरलेल्या कामांच्या रगड्यात रात्र झाली. झोपायची वेळ झाली.

श्रद्धा मुलींच्या खोलीत आली तेव्हा अनू झोपी गेलेली होती आणि मनू तिच्याकडे बघत टक्क जागी.
मनूने अनू जागीच असल्याची खूण केली आणि खुसपुसत म्हटलं,
"तिने मला विचारलं, पुस्तक वाचून मला वाटलं ते मी  राईट-अपमध्ये लिहीलं; तर, बाईंनी सांगीतल्यावर मला का लिहीता आलं नाही?"
"मग, तू काय म्हणालीस?"
"मला नाई माहित. मी काय सांगू?"
स्वत:बद्दल संशय निर्माण होण्याची, आपलं काहीतरी चुकतंय, आपल्यातच काहीतरी कमी आहे असं वाटायची आणि त्याने झुरत बसायची हीच ती वेळ. मला त्यातून बाहेर काढायला माझी आई होती, झालंच तर निरू होता. अनूला कोणेय? तिचा बाबा, मनू आणि मी?
श्रद्धाने अस्वस्थपणे एक आवंढा गिळला.
"कळेल ते. तिलाही आणि तुलाही. कळतं ते आपोआप"
 मनूला किती बरं वाटल्याचं तिच्या चेह-यावर साफ़ दिसलं.
"खरंच? कसं?"
"त्यासाठी एक गोष्ट सांगते तुला."
अनूने कान टवकारल्याचं मनू आणि श्रद्धा दोघींनीही पाहिलं आणि त्या दोघी अनूच्या जवळ सरकल्या. श्रद्धाने गोष्ट सुरू केली.

"खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माणसांची आणि झाडांची घट्ट मैत्री होती. त्या काळात माणूस बिल्डींग बांधायची म्हणून जुनी, मोठी झाडं तर सोडाच, पण छोटी झाडंही तोडायचा नाही. अशाच एका पुराणवृक्षांनी सजलेल्या सुंदर वनात सर्व प्राणी-पक्षी-सर्व जीवजंतू गुण्यागोवि़ंद्याने.. म्हणजे हॅप्पिली राहायचे. त्या वनाचा राजा होता?-"
"सिंव्ह?"
"नाही."
"वाघ?"
"नाही"
"मग?"
"त्या वनाचा राजा होता एक सेंटिपेड. आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्ये दिसतो कधीमधी."
मनूने लागलीच त्यांच्या आयपॅडवर गूगल उघडलं आणि सेंटिपेड सर्च करून त्यांच्या कथानायकाला स्क्रीनवर आणलं.
"हो हो, मला माहितेय. त्याला शंभर पाय असतात नं?"
"हो. तर, हा सेंटिपेड, त्याचं नाव-मि. फ़ूट्सी. हा मि. फ़ूट्सी सर्वांचा लाडका होता. सगळ्या माणसांना दोनच पाय असतात, काही प्राण्यांना दोन किंवा चार पाय असतात, पण याला सहा नव्हे, आठ नव्हे, तर शंभर पाय म्हणून सगळ्यांना त्याचं कोण कौतुक. त्याच्या शंभर पायांचं सगळ्यांना आकर्षणही वाटायचं आणि हेवाही वाटायचा. स्वत:ला "लेग्ज" म्हणवणारा आठ पायांचा टॅरॅण्टुला काय जळायचा त्याच्यावर.."
"खुक्क"- अर्थात मनू

"तो त्याच्या शंभर पायांनी तो खूप सुंदर डान्स करायचा. फ़ुलांचा मोसम आला की सगळं वन त्याचा तो पानाफ़ुलांवरचा डान्स बघायला यायचं. सगळ्यांनाच नाही येत असा डान्स करता. आपल्या अनूसारखं. आपल्या अनूसारखे हायकू करता येतात का कोणाला? "
"मांजर ठसे
शोधताना मातीत
होते मांजर"

किंवा तो बेडूकवाला कोणता?
"बेडूक म्हणे
नवी भाषा शिकलो-
डर डरॉंssssव!"

दोघीही खळखळून हसल्या, अनूचेही गाल वर झाल्याचं मागून दिसलं.

"तर, स्पंजबॉबमध्ये पॅट्रिक स्टार आहे, सॅंडी चीक्स आहे तसा स्क्विडवार्ड पण आहे नं? तसं त्या वनात बिली-बॉब नावाचा एक बेडूक होता. त्याला मि. फ़ूट्सी बिलकुल आवडायचा नाही. त्याच्याकडून राजाचं पद कसं काढून घेता येईल यावर त्याचा सारखा विचार सुरू असायचा आणि एके दिवशी त्याला तो मार्ग सापडला"

एके दिवशी आपला मि. फ़ूट्सी जंगलातून फ़ेरी मारत असताना बिलि-बॉब त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला. त्याने मि. फ़ूट्सीला वाकून नमस्कार केला आणि खोटं-खोटं हसून म्हणाला,
"मि. फ़ूट्सी, मी बिलि-बॉब.  मी तुमचा खूप मोठा फ़ॅन आहे. तुमच्या शंभर पायांनी केलेल्या नृत्याची चर्चा तर आजूबाजूच्या जंगलातही होत असते. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते, तुमची परवानगी असेल तर विचारीन म्हणतो.."

मि. फ़ूट्सीने ’हो’ म्हणताच बिलि-बॉब म्हणाला, "मि. फ़ूट्सी, तुम्ही तर पाहातच आहात की मला चारच पाय आहेत. तरी, मी उडी मारतो तेव्हा माझ्या मागच्या दोन पायांपैकी कोणत्यातरी एका पायावर जास्त भार देतो की दोन्ही पायांवर समान भार देतो, उडी मारताना पुढच्या दोन पायांपैकी कोणतातरी एक पाय पुढे असणार आहे की दोन्ही पाय समान रेषेत असणार आहे हे माझं मलाच माहित नसतं. मी खूप प्रयत्न केला, पण मला काही ते कळून घेता आलं नाही.  मला जे चार पायांनी जमत नाही ते तुम्ही शंभर पायांनी कसं करता बुवा? तुम्ही इतके थोर आहात; तर, नृत्य करताना तुमचा त्रेसष्ठावा आणि चव्वेचाळीसावा पाय करत असतो हे तुम्हाला आधीच माहित असेल ना? तुमच शहाण्णवावा पाय पुढे असताना चौथा पाय पुढे असतो का मागे? तुम्ही सम पायांनी पुढे जाता की विषम पायांनी? मला इतकं सांगीतलंत तरी मी तुमचा आभारी राहिन. मला आलेलं अपयश विसरायला मदत होईल महाराज."

मि. फ़ूट्सीने यावर मान डोलावली आणि डान्सची एक स्टेप करायला सरसावला, पण..
मनूचा आणि पलीकडून अनूचा श्वास स्स्स्स करून आत..
"तो कोलमडून पडला..इतका.. की थेट उताणाच झाला. त्याला सावरायला इतरांची मदत घ्यायला लागली. त्याने पुन्हा एकदा एक साधी सुधी स्टेप करायचा प्रयत्न केला, पण तो सारखा अडखळून पडायला लागला. त्याला समजेच ना आपल्याला काय होतंय ते. बिलि-बॉब हे पाहून मनातल्या मनात हसत होता"

"दुष्ट बिलि-बॉब" मनू फ़िस्कारली.

"मग मि. फ़ूट्सीने उत्तर देण्याकरता बिलि-बॉबकडून दोन दिवस मागून घेतले. ते दोन दिवस मि. फ़ूट्सीच्या डोक्यात सारखा सारखा तोच हिशोब सुरु होता. आपला दुसरा पाय पुढे असताना चोपन्नावा पाय काय करतोय, आपण चालताना कोणता पाय पुढे आणि कोणता पाय मागे यावर. त्यामुळे मग त्याला त्याचा नेहमीसारखा डान्सही करता येईना. डान्स तर सोडाच त्याला साधं चालताही येईना. जो डान्स पूर्वी इतका छान जमायचा, तो आपल्याला आता का जमत नाही याचा विचार करकरुन त्याचं डोकं दुखायला लागलं. "

एव्हाना अनू झोपेचं सोंग सोडून थेट उठूनच बसली होती.
"मग? त्याला कळलं का त्याच्या पायांचं गणित?"
"काय माहित! पण अनू.. गोष्टीचा पॉंईंट तो नाहीच मुळी. आपला पॉईंट हा आहे की त्या अति-विचार करण्याने तो नृत्यकलाही विसरला. आपण चालताना हा पाय पुढे... हा पाय मागे असा सारखा डोक्यात विचार करुन बघ.. एका पॉईंटनंतर आपल्याला अडखळायला होतं. ते नॅचरलीच येऊन द्यावं. त्यावर डोकं शिणवू नये. मि. फ़ूट्सी बघ- त्यानंतर वेडवाकडंच, फ़ेंगाडंच चालायला लागला, ते आजपर्यंत तसंच चालतो आहे. अनू, तुझं लिखाण, मनूचं ड्रॉंईंग ही मि. फ़ूट्सीच्या डान्ससारखी गिफ़्ट्स आहेत. तुम्हाला मिळालेली. कोणी प्रश्न विचारला म्हणून आपल्या गिफ़्ट्सवर संशय घेऊ नये, त्याचा फ़ार विचार करू नये.. नाहीतर ती कायमची हरवतात. मि. फ़ूट्सीच्या डान्ससारखी.."

दोघींना गुडनाईट किस देऊन श्रद्धा जायला निघाली तेव्हा अनू-मनू दोघीही विचारात मग्न होत्या.

--

या गोष्टीतून अनूला काय कळलं, कितपत कळलं, कळलं ते तिच्या डोक्यातला विचारांचा भुंगा थांबवण्याकरता पुरेसं होतं का? श्रद्धाला यातलं काहीच ठाऊक नव्हतं.
पण,
पुढच्याच सकाळी तिच्या टेबलवर सहलीच्या परमिशनचा फ़ॉर्म आणि पेन पाहिलं, तेव्हा-
ते व्यवस्थित पोहोचलंय हे तिला नीटच कळलं.

--

’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट १ | इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट २ । ’इन्टेलिजण्ट’ गोष्टी- गोष्ट ३

मोन्ती व्हाया लुई.

लुई आपला शो आटपून निघालाय. त्याला घरी जायला सबवेने जायला लागतं
इतर सबवे स्थानकांसारखं हे ही एक किंवा दुस-या कोणत्याही सबवे स्थानकासारखं नसलेलं.
काहीही, कसंही.
त्याला एका ठिकाणाहून दुसया ठिकाणी जाण्याकरिता असलेली जागाच म्हणायचं असेल तर त्याला कशासारखंतरी म्हणण्याचा किंवा कशासारखंतरी न म्हणण्याचा उगा का इतका खटाटोप?
तिथली एकमेकांना अजिबात न ओळखणारी, आपापल्या विश्वात रमलेली माणसं. सगळ्यांचे डोळे कशावरतरी खिळलेले. कोणाचे पेपरवर, कोणाचे शून्यात, कोणाचं डोळ्यासमोर दिसत नसलेल्या आणि महिन्याअखेर मुटकून बसवायच्या हिशेबावर.
आपल्या दोन हातांच्या परिघापलीकडे काय चालू आहे याची किती जणांना कल्पना असेल?
पण, या प्रत्येक माणसाची एक वेगळीच कहाणी असते.
लुईची आहे.
त्याच सबवेमध्ये सर्वांपासून  बेदखल असा एक व्हिओलिनिस्ता त्याच्या त्या रक्तचंदनी व्हायोलिनवर मोन्तीचं कम्पोझिशन वाजवतोय.
त्याचीची कहाणी असेलच.
आमेलीमध्ये हिरवा प्रकाश साकळलेल्या सबवे टनलमध्ये रेकॉर्ड वाजवणा-या, ढगासारखे पांढरे केस असलेल्या या बुढ्या बाबाची कहाणी काय होती?
मंत्राने भारल्यासारखं, एखाद्या भुतापाठोपाठ  त्याच्या गुहेकडे जावं तसं आमेलीच्या पाठोपाठ आपण गेलोच की नाही?
तिथे आपली सुटका नव्हती.
इथेही आपली सुटका नाही.
व्हित्तोरियो मोन्तीचं Czardas*
तल्लीन होऊन ते आर्त सूर आळवतोय आपला...
पहिले मंद्र लयीत सुरू झालेलं संगीत नंतर बेभान होत जातं,  पुन्हा मंद्र, पुन्हा द्रुत.
पहिले स्वरांवर आंदुळल्यासारखे झुलणारे आपण आपले श्वास गुदमरल्यासारखे सुरांच्या लाटांवर हिंदकळतोय आपले. पुन्हा स्थिर होऊन श्वास जागी येतोय तोच पुन्हा ती लाट येते.
अजून जरा शांतता असती, आपल्याला अजून गप्प बसता आलं असतं,  श्वास थांबवता आला असता तर, अजून काहीतरी समजलं असतं असं वाटतं.
लुईची अवस्था काही वेगळी नाही. कधी नव्हे तो त्याच्या घशात आवंढा येऊन अडकलाय, समोर दिसणारं जग जरासं आऊट ऑफ़ फ़ोकस झालंय.
त्याला संगीतातलं काही कळतं असा दावा नाही त्याचा. त्याची हंगेरीयन शेजारीण आणि जेन, त्याची बिट्टी पोर व्हायोलिनवर बार्तोक* वाजवत असतात तेव्हा तो आपला चकित होऊन उभा असतो, त्या सुरांमध्ये निथळत. अनंत हस्ते कमलावराने देता घेशील किती दो कराने सारख्या अवस्थेत. एरव्ही शब्दांवर प्रचंड हुकुमत असलेला लुई अशा वेळी काही बोलत नाही. तो ते सर्व आत शोषून घेतो स्पंजसारखं. मुरवत राहतो.
पण, हे व्हायोलिन फ़ार डेंजरस. काहीतरी तुटतंच आपल्याआतलं.
अगदी हुकमी.
नेमाने.
प्र-त्ये-क वे-ळी.
मग त्याच्या कपच्या गोळ्या करताना आपल्याला केव्हातरी मागे निखळलेल्या, रंग उडालेल्या कपच्या दिसत राहतात. ’ठेवून देऊयात, पुढे कधीतरी लावायला होईल’ असं म्हणत तुटलेली करंगळी जपून ठेवल्यासारख्या. कधीकधी उगीचच, कधीकधी मुद्दामहून, तर कधीकधी अजाणतेपणी.
यातून आपल्याला भर्र्कन सावरता येत नाही. दिवसच्या दिवस जातात त्या खिन्नतेमध्ये.
मेलॅन्कोलीमध्ये.
त्या व्हिओलिनिस्तासारखं स्थळ, काळ, विसरून बेभान होणं लुईच्या स्वभावात नाही.
इतक्यात प्लॅस्टीकच्या बाटल्या, डब्बे यांचा डोंगर अंगावर घेऊन एक जाडाभरडा, कळकट मनुष्य  सबवेमध्ये प्रवेशतो.
पाय-यांवरून उतरताना त्या प्लॅस्टीकचा कर्कश्य खडखडाट त्या शांत, म्लान वातावरणात कच्चकन रूततो, शांततेच्या चिरफ़ाळ्या उडतात.
त्याच्या नुसत्या चालण्यातही गोंगाट आहे.
त्या मग्न लोकांना आपल्या विश्वातून दचकून बाहेर यायला लावणारा गोंगाट.
आयरनी अशी आहे, की त्यांना  हा गोंगाट ऐकू आला; पण, इतकं आर्त, तळमळून वाजवलेलं संगीत त्यांच्या कानापर्यंत  पोहोचलंच नाही.
गोंगाट इतक्या लवकर लक्ष वेधून घेतो का?
तो प्लॅस्टीक मॅन चालता चालता एकदम थबकतो आणि आज आपण इथेच झोपायचं असा निश्चय केल्यासारखा एका ठिकाणी अचानक थबकून आपला बोजाबिस्तारा आणि तो प्लॅस्टीकचा पर्वत तिथेच धाप्पदिशी टाकून देतो आणि कपडे काढायला सुरुवात करतो.
दुर्लक्ष करता येईल असा मनुष्यच नाही तो.
आता लुईचं लक्ष कधी मोन्तीच्या त्या सुंदर रचनेवर तर कधी त्या सेल्युलॉईटचा ढिगारा अंगावर वागवणा-या त्या अर्धनग्न कळकट मनुष्यावर.
तो इथेही आहे, तिथेही आहे.
तो यातही आहे, त्यातही असणार आहे.
आता त्याला पर्याय नाही.
आता तो माणूस त्या महाकाय पसा-यातून कुठूनतरी पाण्याची एक बाटली पैदा करतो आणि त्या बाटलीतल्या पाण्याने भर सबवेमध्ये त्याची आंघोळ सुरू होते.
आंघोळ करताना पाणी त्याच्या पाठीवरच्या चरबीतून वाट काढत निघालंय आणि त्याच्या तोंडून सुखातिरेकाने बम्म, भुश्श असे आवाज निघतायेत, तर इथे त्याच्या त्या गोंगाटाने अजिबात विचलित न झालेल्या, स्वत:तच हरवलेल्या त्या व्हिओलिनिस्ताच्या कानशीलावरच्या शिरा ताणल्या गेल्यात, ओठ लहान मुलासारखे पुढे आलेत, कधीकधी वेदनेची एकच उभी आठी चमकून जाते कपाळावर.
ब्रह्मानंदी टाळी लागल्याची लक्षणं-दोघांचीही
तो माणूस अत्यंत बेढब आहे.
हे संगीत किती जीवघेणं आहे
लुई कधी इथे , कधी तिथे
बाटलीतला शेवटचा थेंब संपतो तेव्हा मोन्तीदेखील समेवर आलेला असतो.
त्या समेवर तो कळकट म्हातारा थुंकल्यासारखा हसतो. छद्मी, माथेफिरू हास्य. का? कोणावर? कशासाठी?
ही पण एक वेगळीच कहाणी.
त्या व्हिओलिनिस्ताला याचा पत्ताच नाही, तो चूर आहे त्याच्या जगात. तिथे तो सूर जगतो, सूर खातो, सूर पितो.
त्याने लुईच्या काळजात घर केलं तसं इतरांचं झालं नाही.
पण, त्या कळकट म्हाता-याने लुईसकट सगळ्यांच्या दिवसावर एक ओरखडा उमटवून ठेवला. खिळा काचेवर घासत नेल्यावर उठतो तसा. आता कित्येक दिवस त्याला विसरता येणार नाही.
लक्षात कोण राहणार?
स्मृती कोणाच्या बनणार?
स्मृतीत कोण राहणार?
लक्षात राहाणं, न राहाणं, काय लक्षात राहाणं ते पाहाणं इतकं महत्वाचं असतं का?
शेवटी आठवणीच तर असतात आपल्या सोबत, दुसरं काय उरणार असतं?
या जगातलं नाहीच असं वाटण्याइतकं काहीतरी अतीव सुंदर असं काहीतरी इतक्या कमी लोकांना का भिडतं?
का असुंदराचा आवाजच मुळात इतका मोठा असतो? की ते ब-याच जणांच्या लेखी असुंदर अशा अर्थाने जास्त लक्षवेधी असतं? हे जग अशाच ब-याच जणांच्या लेखी असुंदर म्हणून स्मृतीत राहणा-या गोष्टींच्या पायावर चाललंय का?
अशा वेळी व्हिओलिनिस्तासारख्या माणसांनी काय करायचं?
आपण त्यांचं काय करायचं?
त्यांचं काय होतं?
जे होतं तसं होणं योग्य आहे का?
त्यांना त्याची काही क्षिती असते अशातला भाग नाही,
पण तरीही-
अशा विचारात लुई जायला निघतो.
पण, आपण तिथेच रुतून बसतो. उलटसुलट विचारांच्या कर्दमात रुतल्यासारखे.
आता त्यातून बराच काळ निघणे नाही.
या मानवी आकाराच्या पोकळीचं करायचं तरी काय?

--

संदर्भ: लुई | सीझन २, भाग ६। सबवे/पामेला

"नि इदिया!"

आपण आपलं पूर्ण आयुष्य कशाच्यातरी जंगी तयारीत घालवतो आणि ते ’काहीतरी’ कधीच घडत नाही.

खरंय.

आता माझंच घ्या ना.

मला कुठेही जाताना, असताना-नसताना ’काहीतरी’ घडणार हे सतत वाटत आलंय. पण, ते ’काहीतरी’ म्हणजे काय हे मला कधीच माहित नसतं; म्हणजे, मला ते माहित असावं किंवा त्याची अंधुकशी कल्पना असावी असं देखील मला वाटत नसतं. त्यामुळे होतं काय की, काहीतरी घडण्याची अपेक्षा जरी असली तरी काय घडायला हवंय हे माहित नसल्याने कुठेही जाऊन आल्यावर, असताना-नसतानाच्या नंतर नेमकं काय घडून गेलंय हे मला सांगता येत नाही, त्यामुळे ते घडल्यासारखं असतं. अशारितीने घडणा-या काहीतरीच्या मागे माझं आयुष्य घरंगळत चाललंय.

मला तेकाहीतरीमाहित असतं आणि ते घडलं असतं तर ते मला आवडलं असतं का?

नो आयडीया

-

आज आताही मी एके ठिकाणी निघालेय.

मी जायला निघालेय त्या ठिकाणाचं नाव, तिथे जायला किती वेळ लागतो हे मला सुदैवाने माहित आहे. आणि त्यातून माझ्यासोबत एक मित्र देखील आहे. आणि दोघेही कुठेतरी निघालेत म्हटल्यावर त्यातल्या एकालातरी आपण कुठे निघालो आहोत हे माहिती असतंच. असं माहित वगैरे असलं की बरं असतं. म्हणजे जायचं होतं एकीकडेच आणि पोहोचलो भलतीकडेच, असं होत नाही.

पाय फसून तोंडघशी पडायला होईल इतके विचार करकरून, त्यांची गुंतवळ करून मला काय मिळतं?

हे मला आजतागायत कळलेलं नाही.

-

मी एक सर्वसाधारण सुखी मुलगी असावे.

म्हणजे, मी तसं वाटून घेतलं असतं, तर नक्कीच असते; पण, मी तसलं काही वाटून बिटून घेत नाही.

का?

माहित नाही.

मी स्वतःला प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरंही आपणाहूनच देते. माझा आवडता छंद आहे तो.

"आता या क्षणी आपण टोटल आनंदी आहोत का? खरेखुरे खूष?"

मी अगदी प्रामाणिकपणे स्वतःच्या आत डोकावून पाहाते.

"माहित नाही. असेनही किंवा नसेनही."

"पण आपण तसं मानून चाललं तर काय हरकत आहे?

मी तसं मानून पाहाते. पण थोडाच वेळ. थोड्याच वेळाने मला मनातल्या मनात उमगतं, की हे खरं नाही. या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे असं मी स्वतःशीच म्हटलं असतं, तर ते मला बोचत राहिलं असतं. माझ्यामधून बाहेर पडून मी स्वतःचीच निर्भत्सना करत म्हटलं असतं, "तू खूष आहेस हे थोतांड आहे".

काही वेळा वगळता मला नेहमीच असं वाटतं.

का?

कदाचित काहीतरी राहून गेलेलं असावं; कारण, हे आता जे काही आहे, ते पिक्चर पर्फेक्ट नव्हे.

पण काय राहून गेलंय?

माहित नाही.

-

परवा असंच झालं.

मी कुठेतरी चालले होते. कुठे ते मला नेहमीप्रमाणे ठाऊक नव्हतं. माझ्या बरोबरच्याला बहुतेक माहित असावं. तीनेक तासांच्या ड्राइव्हनंतर प्रवासात एके ठिकाणी पाय मोकळे करायला उतरलो. मी या पूर्ण कल्पनेवरच नाखूष; कारण, माझा आणि उन्हाचा छत्तीसचा आकडा. डोक्यावर पाणी ओतल्यावर अंगभर ओघळणा-या पाण्यासारखं ते ऊन अंगावरून सापाच्या गतीने खाली उतरतं, त्या उन्हाने अंगभर मुंग्या आल्यासारखं होतं, तेव्हा मला कसंसंच होतं, भोवंडून गेल्यासारखं होतं.

मला त्या चाव-या उन्हाचा मनोमन संताप येत होता. उन्हाच्या भपक्याने डोळे दुखायला लागले होते. उन्हाने चमकणा-या, लालसर होत जाणा-या माझ्या हातांकडे पाहात मी थोडंसं स्वतःशीच, थोडंसं दुस-याला उद्देशून म्हटलं, "थंडी वारली आहे का?"

तो काहीच बोलला नाही.

कोणीच काही बोललं नाही.

मी नक्की मोठ्याने बोलले का? की मनातल्या मनातच बोलले आणि मला मोठ्याने बोलल्यासारखं वाटलं?

पण, मला ती शांतता उधळून कशाची शहानिशा करण्यासाठी काहीतरी बोलण्याचा, करण्याचा कंटाळाच आला एकदम. एक वय असतं, जेव्हा आपण खोदून खोदून, स्वतःचं समाधान होईपर्यंत दुसऱयाला उलटसुलट प्रश्न विचारत असतो. मी ते वळण केव्हाच मागे टाकलंय.

पण, अशा शांततेमुळे फाटकन मुस्काटात बसल्यासारखं होतं.

आपल्या शांततेसारखी शांतता असलेली व्यक्ती असेल का कुठे अस्तित्त्वात? आणि असलीच, तरी त्या व्यक्तीची शांतता माझ्या शांततेसारखी आहे हे मला कसं कळेल?

नो आयडीया.

तोवर तरी दुस-याच्या शांततेने, गप्प असण्याने असं खजिल वाटून घेत राहायचं, प्रश्नांचं मोहोळ उठवत राहायचं का?

अॅब्सोल्युटली नो आयडीया!

-

तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना करता तेव्हा ती कल्पना देखील कशावरून आलेली असते? कुठे काही वाचलं, काही पाहण्यात आलं त्यावरून.

उदाहरणार्थ- परवा मी एका देवराईत गेले होते. मी जंगलातून अनेकदा फिरलेले आहे, पण, देवरा म्हणून हा जो काही प्रकार असतो तो पाहण्याची माझी पहिलीच वेळ. मी देवराईचं मनातल्या मनात बनवलेलं चित्र विस्तीर्ण प्रवेशावर दूरदूरवर पसरलेल्या पुराणवृक्षांच्या रांगा, खाली कुरकुरीत क्रॅकजॅकसारखी वाजणारी वाळलेली पानं, त्यावर झोपून वरती पाहात पाहात विचारांचे विचार करत जावेत, करत जावेत, असलं काहीतरी होतं. जवळपास देवरा चित्रपटातल्या देवराईसारखं, किंवा चुके काळजाचा ठोका डोक्यात ठॉकठॉक करून वाजवणा-या एखाद्या गर्द राईमधल्या उंचच झाडांवरच्या झोक्यांनी माझ्या डोक्यात तयार केलेलं.

पण, वास्तवात ती देवरा म्हणजे चाळीस अंशाच्या चढणीने वरवर जात चाललेल्या एका छोट्या नागमोडी वाटेच्या दोन्ही बाजूला पसरलेल्या झाडांची जाळी होती. इथली झाडं निराळीच होती, ती आपल्या नेहमीच्या, माणसाळलेल्या झाडांसारखी नव्हती. इथे त्यांचं राज्य आहे, त्यांचा दरारा आहे आणि त्या संपूर्ण परक्या प्रदेशात मी आगंतुक म्हणून घुसले आहे, याची मला पदोपदी जाणीव करुन दिली जात होती.

पण, मी ज्या कल्पनेवरून माझी देवराईची कल्पना बनवली ती कल्पना देखील कशावरून तरी आलेली असेलच नं? ती कुठेतरी खरोखरीच अस्तित्वात असेल नं?

मागे मागे जात गेले तशी कळलं की,

कुठल्याही कल्पनेचं मूळ शोधायला गेलं तर ते वास्तवात, वस्तुस्थितीतच दडलेलं असतं.

तर मग,

कल्पना शेवटपर्यंत निव्वळ कल्पनाच असण्याची शक्यता कितपत असते?

हे मला अजून कळायचं आहे.

ते मला कळलं तर नक्की काय होईल?

नो आयडीया.

-

त्या दिवशी -याच दिवसांनी फोनबुक उघडलं. थोडी नवी नावं घालायला आणि बरीचशी खोडायला.

त्यात मला एक नंबर दिसला नावाशिवायचा. पानाच्या वरच्या को-या जागेत लिहीला होता. हिरव्या शाईने.

मी हिरवी शा फार कधी वापरलेली नाही.

मी आठवणीत खूप पळापळ करून पाहिली; पण, कोणाचं नाव नाही समोर आलं. मी तो नंबर खोडणार होते तेवढ्यात असू देत, पुढे कधीतरी तो कोणाचा आहे हे समजेल म्हणून खोडायला नेलेला पेन पुन्हा ठेवून दिला.

असं आपण किती वेळा केलं?

असे किती नंबर निरर्थकपणे पडून आहेत आपल्याकडे?

असे नंबर वगैरे वाढत चाललेत की काय आपल्या आयुष्यात?

असे विचार अगदी आकस्मात येऊन मला चकीत करतात आणि छातीत चमक भरून दुखायला लागतं. या छातीतल्या दुखण्याचा आणि आपण रोज करतो त्या कार्डीयोचा, स्विमिंगचा, फाफलत चार किमी चालण्याचा काही संबंध नाही.

असं छातीत दुखू लागलं, जीव घाबरल्यासारखा झाला की हातातलं काम बाजूला टाकून एक शांत झोप काढण्याशिवाय दुसरा काही उपाय असतो का?

मला खरंच माहित नाही.

-

Little Alice fell down
the hole
bumped her head
& bruised her soul

-

माझं त्यापोसारखं झालंय.

पोया फोफशा, थुलथुलीत पॅंण्डाला जेड पॅलेसच्या त्या हजारो मॅड पाय-या चढून जायच्या असतात. मनात इच्छा असते, निर्णय अटळ असतो. बराच वेळ नेट लावून, हाश्शहुश्श करत प्रयत्न केल्यावर एकदाचे पोहोचलो का बघायला तो अपेक्षेने मागे पाहातो, तेव्हा त्याला कळतं की त्याच्या अवघ्या पाच पाय-या चढून झाल्या आहेत.

मला वाटलेलं की माझं खूप सारं जगून, भोगून, जोखून, परखून झालंय. हा दावा खरा असेल, तर का? कशासाठी? किमर्थम? या साध्या प्रश्नांची उत्तरे मला ठाऊक असणं अपेक्षित आहे. हो नं?

पण, हे प्रश्न खरंच साधे आहेत का?

पण तो माझ्या काळजीचा विषय नाही. मला धडकी भरते ती या विचाराने की-

हे प्रश्न चुकीचे तर नाहीत ना?

प्रश्नांबद्दल पडलेल्या या प्रश्नांचं उत्तरही मला माहित नाही आणि मला ते कसं मिळेल हे देखील अर्थात,

मला माहित नाही.

माझं असं का होत असावं याचा विचार करत असताना माझ्या फ़ोनमधल्या संभाषणांचे लॉग्ज, माझे रिलेशनशिप स्टेटस, माझा बॅंक बॅलन्स, बाथरूममधल्या टूथब्रश-होल्डरमध्ये उभा असलेला एकांडा ब्रश यांकडे पाहिलं की मल एकाच वेळी खूप कळल्यासारखं वाटतं आणि त्याचवेळी आपल्याला काही सुद्धा कळलेलं नाही असं देखील वाटतं.

हे सारं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे, कसं बनवणार आहे, आपलं काही बरं करणार आहे की आपली आहे त्याहून जास्त वाताहत करणार आहे?
यांतील किमान काही गोष्टींची उत्तरं नेमकी ठाऊक असती तर फ़ार बरं झालं असतं.

असं म्हणतात की, तुम्ही कुठे जाणार हे तुम्हाला माहित नसेल तर, कुठलाही रस्ता तुम्हाला तिथे पोहोचवेलच.

ओके, हे लॉजिक सध्या चालून जावं.

या सा-या जखमी आयुष्याचं..

दर वर्षी 13 जुलैला मलिका अमरशेखांची ही ओळ आठवते आणि कोणीतरी अणकुचीदार सु‌ई छाताडात खुपसते आहे अशी वेदना होते. मला खूप दुःख झालं, वा‌ईट वाटलं तर कसं वाटेल याची मी ब-याचदा कल्पना करून पाहिलेली आहे, पण, प्रत्येक वेळी माझी कल्पना तोकडी पडते. काही माणसं आज आपल्यासोबत नसण्याचं दुःख मी नेहमी माझ्यासोबतच वागवत असते. कमल देसा‌ई असो, अॅन रँड असो वा मरणाच्या भीतीने आत्महत्या करणारी व्हर्जिनिया असो. आपली आवडती माणसं आपल्यापासून दूर गेली, आपल्यापासून तुटली तो काळ-वेळ-दिवस आपल्या नेहमी लक्षात असतो. लक्षात ठेवायचा नाही म्हटला तरी राहतो.

बरोब्बर साठ वर्षांपूर्वी याच दिवशीद फ्रिदाने या जगाचा दिमाखात, शांतपणे निरोप घेतला होता.

--

काही माणसं जात्याच सुंदर असतात.

ज्या लोकांनी पराभव पाहिला आहे, वेदना, भोग भो्गले आहेत, अविरत संघर्ष केला आहे, खूप काही गमावले आहे आणि त्या खोल खोल गर्तेतूनही त्या माणसांनी जगत राहण्याचा मार्ग शोधून काढला आहे ती माणसं अतिशय सुंदर असतात.

आणि फ्रिदा का‌अलो अतिशय सुंदर होती.

--

आपलं असणं, आपल्याला जे काही वाटतं त्यात छान छान काहीच नसतं. त्याने अतोनात त्रास होतो. प्रेम म्हणजे किती छान असं काहीतरी लोकांच्या मनात भरवून दिलं गेलेलं असतं. पण नाही. प्रेम छानछान मुळीच नसतं आणि काहीतरी वाटणं तर खूप अस्वस्थ करणारं असतं. पण ही अस्वस्थता, हे दुखरंपण म्हणजे काहीतरी भयंकर, घातक आहे असं लोकांना वाटतं, त्यामुळे काही लोकांना स्वतःची भीती वाटते, त्यांच्या असण्याची, त्यांच्या वास्तवाची, त्यांच्या वाटण्याची भीती वाटते.  फ्रिदाला ती कधीच वाटली नाही. उलट, हे वाटणं, असणं, तिचं ढळढळीत वास्तव हेच तिचं सर्वकाही होतं. तिने म्हटलंच आहे, "नुन्का पिन्तो सु‌एन्योज ओ पासाडीयाज, पिन्तो मि प्रोपिया रि‌अॅलिदाद!" पाब्लो पिकासो त्यांच्या पेन्टींग्जबद्दल बोलताना म्हणतो की, मला माझी पेन्टींग्ज स्वप्नात दिसतात आणि मग मी ती स्वप्नं पेन्ट करतो. फ्रिदाने तिची स्वप्नं किंवा दुःस्वप्नं कधीच पेण्ट केली नाहीत तिने कॅन्व्हासवर उतरवलं ते तिचं शुद्ध वास्तव, जसं आहे तसं तसं, त्यात काहीही फेरफार न करता. चित्रं काढणं ही तिची गरज होती, जशी लिहीणं ही माझी गरज आहे.

--

फ्रिदाबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल खूप प्रवाद आहेत. ती वादळी आयुष्य जगली. तिच्यासारखे आपलेही आपल्याशी, इतरांशी आणि एकंदर ब-दयाच गोष्टींशी जे झगडे चालू असतात त्यातून आपण तदनुभूती म्हणजे एम्पथी शिकतो. तिची पेन्टींग्ज पाहिल्यानंतर, तिच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यानंतर मला तिची वेदना थोडीफार का हो‌ईना कळू शकते, कोणीतरी टाकून देणं मला कळू शकतं, माझ्यावर कोणीच प्रेम न करणंही मला कळू शकतं. पण त्याहूनही मी जगत राहते. मला हे बळ फ्रिदाने दिलेलं आहे.

फ्रिदाने तिची स्वतःचीच बरीच पोर्टेट्स काढली आहेत. त्याबद्दल बोलताना ती म्हणते, मी खूपदा एकटीच असते. आणि तिला मी अगदी चांगली ओळखते अशी व्यक्ती मीच आहे.
तिची पेन्टीग्ज ही तिची डायरी होती.

कोणी इतकं आपल्यासारखं कसं काय असू शकतं? हं?

--

मला कधीतरी असं लिहायचंय की जे वाचताना लोकं ते समोरच्या क्रीनवर, पानावर लिहीलं गेलं आहे हे विसरून ते शब्दशः जगतील. जसा एखादा संगीताचा तुकडा तुमच्या ह्रदयाला भेदून जातो, तिथे रुतून बसतो, तिथेच हुळहुळत राहतो.द फ्रिदाला तशी चित्रं काढणं जमलं. मी अद्याप जमवतेय.

--

प्रत्येकाच्या आयुष्यात न-परतीचा एक क्षण असतो. परतायचं असतं असं नाही पण येतानाच आपण सर्व दरवाजे बंद करून त्यांची किल्ली कुठेतरी अज्ञात स्थळी फेकून आलेलो असतो. असा क्षण प्रत्येक उत्कट माणसाच्या आयुष्यात येतो. आणि कधीकधी असंही होतं की आपण आहे त्याहून पुढे जा‌ऊ शकत नाही. जायचं असतं असं नाही, पण आता पुरे असं वाटतं. आपण त्या क्षणाप्रत पोहोचतो तेव्हा आपण झालं-गेलं,  घडलं-न घडलं ते सगळं शांतपणे मान्य करून टाकतो. जगत राहण्याकरिता ते गरजेचं असतं.

मी काय, फ्रिदा काय, आपल्यासारखी बरेच जण उत्कट असण्याचे हे भोग भोगत असतात आणि आम्ही ते जहरी भोग भोगण्याचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा आवंढे गिळत त्यांचे रेकॉर्ड बनवून ठेवतो. पेण्ट करतो, कविता करतो, लिहीतो. कदाचित आमच्याकडून कोणाला काही मिळू शकेल, कोणाला काहीतरी शिकता ये‌ऊ शकेल. पण, हे काही शिक्षण नव्हे. हा आमचा इतिहास असतो.

फ्रिदाच्या किंवा कोणाही उत्कट व्यक्तीच्या इतिहासातून काही शिकायचे असेल तर हे शिकता येईल-जे मी शिकले- की तुमच्या वाटण्याची, तुमच्या वास्तवाची भीती वाटू दे‌ऊ नका. तुम्हाला काही वाटण्याचीच भीती वाटली, तर तुम्ही कोणावरही, कशावरही निव्वळशंख प्रेम करू शकणार नाही. तुमच्या जगण्यावर नाही, तुमच्या स्वतःवर नाही आणि दुस-द्याद कोणावर तर नाहीच नाही. या वाटण्यातून दुखतं, पण त्यातून आपल्याला अविरत बळ मिळत जातं. वाटण्याला-असण्याला सरळ छाताडावर घे‌ऊन भिडा किंवा त्याच्यापासून भेकडासारखे लपून बसा, वेदना ही असतेच. फक्त ती आयुष्याला भिडून भोगायची की डिनायलमध्ये जगायची हा आपला चॉ‌ईस असतो. आणि ती भोगायची कशी, ती आपल्याबरोबर पुढे कशी न्यायची याचा मार्गदेखील मात्र आपला आपल्यालाच शोधून काढायचा असतो.

--

फ्रिदाने द डायरी ऑफ फ्रिदा का‌अलोमध्ये म्हटलंय, "मला वाटायचं की मी जगातलं सर्वात विचित्र माणूस आहे. पण नंतर विचार केला की, जगात इतकी सारी लोकं आहेत तर माझ्यासारखंच विचित्र असणारं, माझ्यासारखंच चुकणारं-पडणारं एकतरी माणूस असेलच. मी त्या व्यक्तीची कल्पना करून पाहते. ती व्यक्ती देखील जगातल्या कुठल्यातरी कोप-यात असेल आणि माझा विचार करत असेल. तू जर खरोखरीच या जगात कुठेतरी असलीस आणि हे वाचलंसच तर निश्चिंत हो. मी खरोखरीच आहे आणि मी पण तुझ्या‌इतकीच विचित्र आहे."

मला आजतागायत कोणत्याही ओळींनी इतकं निश्चिंत, आश्वासक वाटलेलं नाहीये... कधीच.

"अनाघ्रात असं नस्तंय काहीही
हे ठीकच आहे
पण मात्र या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय? "

हा प्रश्न मलापण पडलाय फ्रिदा.

फक्त हे तुला कळवता आलं असतं तर फार फार बरं झालं असतं. पण सगळ्या गोष्टी जमवता येत नाही, काळाचं, पिढीचं, ब-याचशा गोष्टीचं गणित चुकतं.

मग पुन्हा एक वर्ष सरेल, पुन्हा गळ्यात आवंढा दाटून ये‌ईल, तेव्हाही "या सा-या
जखमी आयुष्याचं करू तरी काय?" ्द हा प्रश्न कदाचित तितकाच व्हॅलिड असेल. तेव्हा तू असतीस तर कसं या विचाराने माझं कानशील दुखरं दुखरं हो‌ऊन जा‌ईल.

पण चालायचंच.

 
Designed by Lena