अगं अगं बशी...!!

दर शनिवारी मी बशीत बसून मुंबैला येते..
आजवर मी अनेक प्रकारच्या बशींमधून प्रवास केला..एस.टी(लाल डब्बा म्हटलं तर हल्ली एस.टी वाल्याना राग येतो असं ऐकलं!!), एशियाड, सेमी-डीलक्स, स्लीपर कोच, व्हिडीयो कोच, ए.सी, नॉन -एसी ....यू नेम इट!
पण दर शनिवारी घडणारा ’शिवनेरी’चा प्रवास मला मनापासून आवडतो..!!
एरव्ही एशियाड स्टॅंड्च्या बाहेर रिक्शाने उतरलं की रिक्शावाल्याशी हुज्जत घालून होत नाही तोवरच नीता ट्रॅव्ह्लस, मेट्रो बस, स्वप्नदर्शन तत्सम नावाच्या बसकंपन्यांचे एजंन्ट्स अंगावर चाल करून येतात..पण ती नामुष्की माझ्यावर सहसा येत नाही कारण माझं तिकीट ’प्रिय’ने आधीच रिझर्व्ह केलेलं असतं आणि तो मला गाडीने सोडायला आलेला असतो..
’प्रिय’ची प्रचंड बोंब ठोकत येणारी चेतक, पिलीयनवर त्याहून जास्त कलकलाट करणारी मी आणि मी काय बोलतेय यातलं एक अक्षर जरी कळलेलं नसलं तरी दर २ मिनीटाला मुंडी हलवणारा ’प्रिय’ अशी आमची वरात एशियाड स्टॅंड वर आली की "कोण आलं ते??" अशा आविर्भावात स्टँडवरच्या निम्म्या नजरा आमच्याकडे कुतुहलाने वळतात..
आणि..
घनघोर गवतात एखादी छोटीशी मुळी उगवावी तशी मी ’प्रिय’च्या मागून अवतरलेली पाहून बरयाच जणांच्या चेहरयावर हसू फ़ुटतं..
एवढंच पुरेसं नाही तर त्या दोन बाय दोन अंगुळे साईझच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात मग्न असलेला पेप्सीकोलाच्या साईझचा माणूसही आमच्याकडे नजर टाकून घेतो...
बसमध्ये चार तास निवांत मिळतात म्हणून मी करायला कामाची जंत्रीच आणलेली असते...त्यामध्ये राहून गेलेले वाचन, कवितांचे ड्राफ़्ट्स सुरेख उतरवून काढणे..’आज तू कसा चुकलास??’ हे १२ साईझचा एसेमेस लिहून ’प्रिय’ला पाठवणे अशी वरीच कामे येतात...
वाचनात पु.ल, चि.विं वगैरे असेल तर मी माझं नेहमीचं होहो हुई करत खिदळखोबरीसारखी खिदळते (तोंडावर हात ठेवून लाजरं हसणं बिसणं बात आमच्यात नाही)..त्यामुळे बसमध्ये काहीतरी विनोदी वाचायचा माझा बेत आहे हे ’प्रिय’च्या लक्षात आलं की तो ’आमेन!’(माझ्या सहप्रवाशांसाठी) म्हणूनच मला बसमध्ये पाठवतो...
तिकीट घेऊन शिवनेरीत शिरत नाही तोच लक्षात येतं की झाडून सगळ्यांची नाकं ऑलरेडी कपाळावर गेलेली आहेत..
उजवीकडे ’I Suffer From CRS (Cant Remember Shit!)' तत्सम अर्थाचा शर्ट घातलेली बोजी...डावीकडे टाईम्स लावून लावून वाचणारा बोजा...टिपीकल पब्लिक...
अरे यांना कोणीतरी असांगा रे...शिवनेरीत मराठीचे वावडे नाही म्हणून!!!
कोणाच्याही हातात संध्यानंद, सामना तर म्हणतच नाही मी पण गेलाबाजार सकाळही दिसत नाही..
शिवनेरीच्या एसी मध्ये आल्यवार टाईमपासच्या कल्पना पण ’शीतकटबंधीय’ होतात की कय कोण जाणे???
मी पुढच्या वेळी ’द फ़ाऊंटनहेड’ वाचायला आणणार आहे.. आणि केवळ हातातलं पुस्तक हिंग्लीश आहे म्हणून आपण आहोत त्यापेक्षा जगाला कितपत वेगळे दिसू शकतो हे बघणार आहे...
माझ्या जागेपाशी येऊन ’प्रिय’ च्या उर्ध्व लागलेल्या डोळ्यांची तमा न बाळगता मी माझ्या शेजारयाला न्याहाळून घेते...आणि मगच आपल्या सीट्वर जाऊन बसते..
शिवनेरीची सीट ही माझ्याकरता एक डोकेदुखी आहे...
सीटवर मागे डोके ठेवायच्या जागी सतत डोकं ठेवून पडलेला एक काळा डागवाला खळगा असतो..
कधी पूर्ण रिकाम्या शिवनेरीत जाऊन बघा...सगळ्या सीट्स काळा मळवट भरलेल्या निळ्या बायांप्रमाणे दिसतात...
पण हे प्रकरण फ़क्त दिसण्यापुरतं बरंय...कारण भडभडून येण्याइतपत फ़्लेवरचा वास या मळवटांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
त्यामुळे शक्यतो त्या काळ्या मळवटापासून ६ इंच खाली डोकं ठेवून त्याखाली आपलं धड ऍडजस्ट करून उरलेल्या जागेत पाय ठेवू म्हटले तर ठेवावेत तरी कुठे?? या विवंचनेत ’पोझिशन’ ऍडजस्ट करेपर्यंत औंध येतं..
आजपावेतो माझ्या शेजारी कोणीही बेबी/बाबी लोकं आलेली नाहीत नेहमी आलीत ती बाबा/बाप्पू लोक...
बाबा आला की सामान ठेवण्याच्या बहाण्याने आपल्या बाजूची स्त्रीलिंगी वस्तू कशी आहे हे डोळ्याच्या कोपरयातून बघून घेतो...
डुईपासून सुरुवात करताना माझ्या बॉयकटपाशीच त्याचा उत्साह निम्मा झालेला असतो अणि पायातल्या कॅन्हासच्या शूजपाशी शक्तिपात..!
त्यामुळेच माझ्या शेजारचे बाबा लोक निव्वळ झोपा काढत असावेत बहुतेक!!!
पण मी?
मला असले डोळ्याचे व्यायाम बिलकुल जमत नाहीत..
मायला...ताकाला जाऊन भांडं लपवायचंच कशाला म्हणते मी...
मी त्याला सीध्ध्धा न्याहाळून घेते...
बरा वाटला तर ’प्रिय’ ला फ़ोन करून पकवायला आयताच एक विषय ...नाही बरा...Who Cares???
माझ्याबाजूला आलेला बाबा ’खूबसुरती बाहरी नही, अन्धरूनी होती है’ अशा टाईपचा उदारमतवादी जरी असेल तरी औंधपर्यंत माझे ऍक्रोबॅटस बघून शरणचिट्ठी देतो आणि सरळ झोपी जातो...
"कसली खसखस चालवलेये कार्टीने??डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!!!"हे सायलंट...मनातल्या मनात..!!
छान स्थिरस्थावर होऊन मी माझ्या आवडीचं काही करायला घेतेय तोच तो फ़ुड-मॉल येतो..आणि पुण्यात सगळ्या दुकान-हॉटेलांचा हरताळ असल्यासारखं सगळं पब्लिक ते भयंकर महागडं खाणं खायला बाहेर पळतं...
आता मै और मेरी तनहाई???
अहं..
बसमधल्या एकांताचा फ़ायदा घ्यायला एखददुसरं जोडपं रेंगाळलेलं असतंच..
दोन सीट मधल्या फ़टीतून मला सग्गळं दिसत असतं...पण त्यांना मी तिथे आहे याची जाम खबर लगत नाही..
पण माझा मूड बूटात असेल तर अचानक त्यांच्यापुढे उगवून त्यांची गाळण उडवण्याचं धक्कातंत्र जरूर अवलंबते..
मग हडबडलेला मुलगा मुलीला म्हणतो..."चल...लेट्स ईट आऊट!!"
ऑमॉला सग्गळं ठाऊक्काय...लब्बॉड..!!!Lets eat out म्हणे....
१० मिनीटाने सगळे परतले की त्या काचबंद शिवनेरीत भयंकर दर्प दरवळायला लागलेला असतो...
माझ्यावर सूड उगवायचा म्हणून माझा शेजारी फ़ुडमॉलवरच्या फ़ोडणीच्या पातेल्यात जाऊन बसल्यासारखा घमघमत असतो...मागच्या सीट्वाल्याने तोंडाची गिरणी चालू केलेली असते आणि गिरनीतून मच्याक मच्याक आवाज यायला सुरुवात झालेली असते...
माझं डोकं अचानक खूप भणभणायला लागतं..
त्यामुळे घाट येईस्तो मी डोक्यावर शाल ओढून घेऊन, कानात ’टेंपरेचर’ फ़ुल ऑन ठेऊन गपचिप पडून राहते...
थोडया वेळाने एसीच्या थंड वारयाने तो वास ’बसला’ की मी डोकं बाहेर काढून पुन्हा पोझिशन, चुळबुळ इ. च्या मागे लागते...
"कसली खुड्बुड चालवलेये कार्टीने??डोळ्याला डोळा लागू देईल तर शप्पथ!!!"यावेळी मात्र चेहरयावर हिंसक भाव!!!
अशारितीने पनवेल येता येता पुस्तकाची २० पाने वाचून होतात न होतात तोच आलेल्या ढेकरामुळे आज फ़ुडमॉलवाल्याने पावभाजीत चमचाभर बटर जास्तच दिलं हे ड्रायव्हरच्या लक्षात येतं आणि त्या आनंदात तो आम्हा सगळ्यांना कंपल्सरी ’यफ़.यम’ ऐकायला लावतो...शिंची कट्कट...!!
आता हातातलं पुस्तक गुमान आत ठेवायचं आणि बाहेरची गंमत (?) बघत बसायचं...
पण त्यातही नंतर गंमत वाटायला लागते...
खारघरचा फ़्लाय-ओव्हर ओलांडेपर्यंत बसमध्ये उठा-उठा सकळीक झालेलं असतं...
माझ्या सीट वर अनैसर्गिक स्वस्थता बघून बाजूचं पब्लिक अंधारात हातोहात बदललं की काय हे डोळे फ़ाड्फ़ाडून बघायचा प्रयत्न माझा शेजारी करत असतो...
पण तेवढ्यात चुनाभट्टी येतं आणि चुनाभट्टी आल्यावर नेहमी लागणारं हिमेशचं ’हरी आऊम..हरी आउम...हरी ओआऊऊम’ लागतं आणि मी ’खिक’ करून दात काढते....
फ़ुस्स...आपल्याबाजूची पार्टी तीच आहे ,काही अंधारात बदलली बिदलली नाहीये हे शेजारयाच्या लक्षात येतं..आणि तो लक्षात येण्याइतका हिरमुसुन बळंच पलीकडच्या खिडकीतून बाहेर पाहायला लागतो...गेला टिपरीत!!
सायन च्या ट्रॅफ़िक्मध्ये कारमधल्या, बसमधल्या छोट्या पोरांना चिडवत, डोळे काढून घाबरवत वेळ जरा बरा जातो..
मग येतंच दादर..
दादरला आल्यावर मात्र पुण्याच्या हवेने सुस्त झालेली, ’प्रिय’च्या लाडांनी हुळहुळी झालेली माझ्यातली मुंबईकरीण खाडकन जागी होते...आणि कशीही करून ८-५६ मिळालीच पाहिजे..जय महाराष्ट्र!!! अशी बोंब ठोकत रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावते..
शिवनेरीतून उतरते ते पुढच्या शनिवारी भेटण्याच्या वायद्यानेच!!!
’शिवनेरी’ही मग मोठ्याने भूश्श आवाज काढत मला ’सीया!’ म्हणते..

अपरिहार्य कारणास्तव...

२९ तारखेला वर्ग सुरु करण्याआधी सर एकच वाक्य बोलले...
"तुम्ही पास होणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला एव्हाना कळलं असेल.."
यु.पी.एस.सी च्या तयारी वर्गातली आम्ही पन्नास एक मुलं-मुली सुन्न बसलो होतो...
करकरे सर, कामते सर यांच्या मृत्युच्या धक्क्यातून आम्ही अजून सावरलेलो नव्हतो..
आपल्याला पोस्ट मिळाल्यावर आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचाच विचार त्या वर्गातला बहुधा प्रत्येकजण करत होता..
’टॉक लेस..ऍक्ट मोअर’ हे ब्रीदवाक्य असणारे आम्ही २ मिनीटे श्रद्धांजली वाहून अभ्यासाला सुरुवात करतो...
जे घडतंय त्याला आपण बदलवू शकत नसू तर त्याबाबतीत वाचाळायची काहीही गरज नाही...हा घालून दिलेला नियम आम्ही तंतोतंत पाळतो..
पण त्याने विचार करणं थोडीच बंद होतं...???
काही उमटणं थोडीच कमी होतं..??
गेलेली माणसं परत थोडीच येतात..???
मनाचा धडा करून कणकण मरत जगणं थोडीच कमी होतं???
लॉलीपॉप सारखी हातात एके-४७ नाचवत एक भिकारचोट कसाब येतो...बंदुकीची एक अंदाधुंद फ़ैर झाडतो...एक बुलेट आपल्या दिशेने येते...बास्स...
जस्ट लाईक दॅट..काही सेकंदाचा अवधी आणि ब्लॅक-आऊट..
आपणही त्या जागी असलो असतो या विचाराने मन थरकापतं..
मरण इतकं स्वस्त असतं..???
विचाराने भोवंडायला होतं, आणि मग कोणालातरी विचारलं जातं...
हे असं का???त्यांच्याबाबतीतच का???
याच्यावर मला त्याहून होपलेस उत्तरं मिळतात..
"आपल्या हातात काय आहे...आपण काय करणार त्याला??"
"झालं ते घडून गेलं..त्यांची वेळ आली होती असं समजायचं आणि यापुढे सजग राहायचं"
"शो मस्ट गो ऑन"
म्हणजे हे सगळं असंच घडायचं होतं...त्या लोकांना जायचंच होतं..??
आपली वेळ आली नव्हती बहुधा..म्हणून वाचलो..
किती सोयिस्कर स्पष्टीकरण...! का मनाची घातलेली समजूत???
मग त्या कर्त्याकरवित्याला अशीच मेहेरनजर ठेवायला सांगून पुढच्याच क्षणापासून निर्विकार होऊन जीवन कंठायचं...
हे इतकं सोप्पं असतं???
नियतीनुसार असंच घडणार होतं तर नियती,प्राक्तन वगैरे वर विश्वास ठेवणारयांना असं नाही वाटलं के नियती जरा जास्तच पार्शालिटी करतेय??
एका धक्क्यातून सावरतो नाही आहोत तर कुचकटपणे दुसरा धक्का देतेय..??
असे आणखी किती धक्के पचवायचे आहेत कुणास ठाऊक??
आणि असं काही घडलं की मग ज्वलंत वगैरे कवितांना अगदी सुगीचे दिवस येतात..
याच काळात मी एका ब्लॉगवर अकलेचे तारे तोडलेले पाहिले...
लेखक म्हणतो.."बरं झालं...हेमंत करकरेंना गोळी लागली...त्यामुळे आता पोलिसांना अद्ययावत बुलेट्प्रुफ़ जॅकेट्स मिळतील.."
मला अगदीच मान्य आहे की लेखकाने ते भावनेच्या भरात लिहीलं होतं पण इतकं बेजबाबदार विधान करण्याचा आपल्याला कितीसा हक्क पोहोचतो???
आपण फ़ील्ड वर होतो..??? नाही...
अतिरेक्यांशी आपण लढलो??? नाही...
पुरेसं संरक्षणही नसताना आतल्या ओलिसांसाठी स्वत:चे कुटुंब, आयुष्य ऐरणीवर ठेवून आपण जीवाची बाजी लावली?? नाही...
आपण टॅक्स भरला किंवा ह्या देशाचा नागरीक असल्याची किमान कर्तव्ये केली की वाट्टेल ते बडबडायचा अधिकार मिळतो की काय कोण जाणे???
हा काय कुठला यज्ञ वगैरे आहे का???आधी बळी द्या मग मी तुम्हाला बुलेटप्रूफ़ जॅकेट्स देतो..
आणि त्या होमकुंडात मग करकरे सर, कामते सरांसारख्या ऑफ़िसर्सचा बळी द्यायचा...
आणि आपण काय करतो???फ़क्त चर्चा करतो..
चर्चा करून तोंड दुखले की चॅनेलवरच्या लाईव्ह टेलिकास्टला मुंगळ्यासारखे चिकटून बसतो..
आणि याबाबत छेडले की म्हणतो.."आपण काय करणार?"
आपण ज्या सिस्टीमला कोसतोय...जिच्या नावाने आता ठो ठो बोंबलतोय..त्या सिस्टीमचा एक भाग होऊन बदल घडवून आणायची किती लोकांची तयारी आहे???
पोलिसांना बुलेटप्रूफ़ जॅकेटसही न पुरवता त्यांना एके-४७चा सामना करायला लावणारया मठ्ठ, कोडग्या सरकारला धडा कोण शिकवणारेय??
भ्रष्ट, किडलेल्या नोकरशाहीला बदलवण्याची जबाबदारी कोणाची??
अर्थातच आपली...
जनतेची..तरुण आणि तरुणींची...
पण आपण ते करणार नाही...
आपल्याला काय ..छोटीशी गाजरंही पुरेशी असतात...
कालच पेट्रोल आणि डीझेल चे भाव कमी केले...पुढल्या दोन महिन्यात सोयी-सुविधांचा पाऊस पडेल...मग आपण त्यापायी २६/११, लोकल बॉम्बिंग सगळं सगळं विसरून जाऊ..
आपण कसं मरावं हे सरकार ठरवत आलं होतं आणि यापुढेही सरकारच ठरवेल..
एखाद्या वेश्येला गिर्हाईकाने नुसता हात लावायचा का आणखी काय करायचं हे तिचा दलाल ठरवतो ना...अगदी तसंच..
जुलैच्या बॉंम्बस्फ़ोटांमध्ये दोन दिवस डोळ्याचं पाणी खळलं नव्हतं..
खैरलांजीचा एफ़.आय.आर वाचताना कानात दडे बसले होते...हातापायांना कंप सुटला होता..
नुसतं काहीतरी वाटतं आपल्याला...दोन टिपं गाळतो आपण.. चुकचुकतो.. हळहळतो..मग तीच कहाणी मागच्या पानावरून पुढे चालू...
पण..
जे घडलं ते पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्यास आपण लायक आहोत का??हे पहावं आधी..
नसलो तर या परिस्थितीत कशाही आणि कोणत्याही प्रकारे बदल घडवण्याची ताकद प्रथम आपल्यात निर्माण करावी..
पण नुसतं संवेदनशील होऊन काय फ़ायदा???
आणि प्लीज..
झाले खुट्ट की केली कविता...झालं खुट्ट की लिहिलं झणझणीत...असं केलं की आपण भारी संवेदनशील असं वाटतं का लोकांना..???
बरं..आपल्याच्याने काही होत नसेल तर जे करतायेत त्यांनातरी ते करू द्यावं...
ताज आणि ओबेरॉयच्या परिसरात फ़ायरींग चालू असताना लोक पिक्चरचं शूटींग पाहायला जमावीत तशी जमली होती...हॉटेल मधून एखादी फ़ैर झाडली गेली की मूर्खासारखी खिदळत आणि टाळ्या वाजवत होती..
कसाबचा एखादा भाऊ तिकडे टपकला असता तर किती कॅजुअल्टी झाली असती हे या बिनडोक लोकांना का कळत नाही???
जिकडे जमायला नको तिकडे ही माणसे बरोबर जमतात...
जमली तर जमली..जे करायला नको ते करतात...
मग अशा मूर्ख लोकांचे फ़ोटो घेऊन त्या फ़ोटोच्या ढुंगणाखाली ’मुंबईकरांचे स्पिरीट’ लिहून वर्तमानपत्रे आपला खप वाढवतात..
निष्कर्ष काय???फ़क्त नोकरशाही आणि सरकारच नाही...तर लोकांची कोडगी मानसिकताही बदलवण्याची गरज आहे..
अशा मूर्ख लोकांवर राज्य करणं राज्यकर्त्यांच्या हातचा मळ का नाही असणार???
हे खूप फ़िल्मीस्टिक वाटेल...पण ’रंग दे बसंती’ मध्ये नेमक्या प्रश्नावर बोट ठेवलं गेलं होतं..
करण, अस्लम च्या पात्रांमधून "जिस दिन ग्रॅज्युएशन हुआ..मै तो कट लूंगा अमेरिका...मेरा यहा कुछ होनेवाला नही.." म्हणणारया आजच्या तरूण पिढीची मानसिकता दाखवली गेली होती..
"कोई भी देश बेहतर नहीं होता...उसे बेहतर बनाना पडता है" म्हणणारा फ़्लाईट लेफ़्टनंट अजय असाच एक आशेचा किरण..
आपल्या सुरक्षित जगांमध्ये राहून ..एखाद्या गोष्टीवर लिहून अथवा बोलून बदल घडवता येतो हा समज साफ़ चुकीचा आहे..
आणि बदल घडवण्याची जिद्द न बाळगणं हा अक्षम्य गुन्हा...!!
(टाईमपास साठी जे पब्लिक अशा विषयांना हात घालतं त्यांनी माफ़ करावं..ही ऊरस्फ़ोड तुमच्याकरता नाही..)
२६ ला जे काही झालं त्यावर लिहायचं नाही...कितीही वाटलं तरी...हे ठरवलं होतं...आतपर्यंत पाळलंही..
पण आज माझ्याच मागच्या पोस्टस वाचताना मला खूप थिल्लर..चीप वाटायला लागले...
मी...माझ्याभोवती विणून घेतलेले एक जग...माझी ध्येयं...माझा अभ्यास...’प्रिय’...किती कोझी...किती उबदार..!!
हे जपलेलं जग किती सहज तडकणारं आहे याची जाणीव झाली..
ह्या विषयावर आतापर्यंत लिहिल्या/वाचल्या गेलेल्या काही अपरिपक्व लिखाणाने संताप संताप झाला..
म्हणून..
 
Designed by Lena