प्रेम..तुमचं माझ्यासारखं?? कभ्भी नहीं..

सकाळी कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा पकडली..
जनरली रिक्षा पकडताना मी मागचा डेक बोंबलत नाहीये ना??याची खात्री करूनच बसते..
कारण दिवसाची सुरुवात मला ’अनुनासिक’ आवाजातल्या गाण्यांनी किंवा ’काला कौवा’ सारख्या थिल्लर गाण्यांनी बिलकुल करायची नसते..
पण आज चॉईस नव्हता...उशीर झाला होता..
आणि माझ्या दुर्दैवाने कुठल्यातरी ऊरूसाला निघाल्यासारखे सगळे रिक्षात भरभरून जात होते..आणि माझ्यासमोर उभी राहायची ती रिक्षा कुठेतरी भलतीकडेच जाणारी असायची..
एखादी रिकामी सीट असलेली रिक्षा मी सोडून बाकी सगळ्यांच्या नशिबात का???असा वायफ़ळ विचार करत मी उभी होते..
तेवढ्यात एक रिकामी सीट असलेली रिक्षा माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि अहो आश्चर्यम!!! ती स्टेशनला जाणारीच निघाली..
रिक्षा चालू होऊन २ मिनीटे होतात न होतात रिक्षावाल्याने डेक लावला आणि कुठले गाणे लागले असेल????
जस्ट इमॅजिन..

चाहत नदिया
चाहत सागर
चाहत धरती
चाहत अंबर

चाहत राधा
चाहत गिरिधर...

मी बसल्याजागी भंजाळून गेले...
गीतकार काही ऐकायलाच तयार नाही???
महालक्ष्मी लॉटरीचा लॉट लागल्यागत गीतकाराने उपमा,उत्प्रेक्षांना हाताशी धरून अगदी हलकल्लोळ घातला होता..
म्हणजे चाहत धरती,अंबर वगैरे ठीक आहे पण
’चाहत गंगा,चाहत जमुना’????
काय संबंध???
कशाचा कशाला संबंध नव्हता खरंतर...
गीतकाराचा शब्दांशी नाही...शब्दांचा अर्थाशी नाही...ऐकणारयाचा गाण्याशी नाही...गाण्याचा श्रवणीयतेशी नाही..
शंकरपाळ्या पाडल्यासारख्या उपमा ’पाडल्या’ होत्या..
’चाहत’ शब्दाला किती स्वस्त करून टाकलं???
प्रेम खरंच शब्दात पकडता येते का????
’प्रेम’ या विषयात मी तज्ञ आहे अशातली बाब नाही पण..
माझ्यामते प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे समर्पणवृत्ती ही झाली मॉंटेसरी लेव्हल..
हे असल्याशिवाय ज्युनियर के.जी. त प्रवेश नाही....मॅट्रिक्युलेशनची स्वप्नेच सोडा..

प्रेम म्हणजे काल-अपरोक्ष दिवसागणिक नवा होत जाणारा संवाद..
कधीकधी एकमेकांबद्दल वाटणारा असह्य तिटकारा,ह्या तिटकारयातून एकमेकांबद्दलची द्विगुणित होणारी ओढ..
’अहं’ ला दिलेली मूठमाती, याउलट कधीकधी जाणवूही न देता जपला गेलेला अहंकार..
आपल्या उणीवांवर मात करून दुसरयाला सुखात ठेवायची केलेली धडपड..
आपल्याही नकळत मान्य करून टाकलेले दोष..
प्रत्येक अडचणीच्या वेळी आवर्जून घ्यावासा वाटलेला सल्ला, लपवून ठेवावीशी न वाटणारी गोष्ट..
गळ्याशी येणारे कढ आवरत कंठलेले संघर्षाचे क्षण..
’आपण हे एकदाचं संपवून का टाकत नाही???’या भोज्ज्याला शिवून आलेली दोघं..
निग्रहाने राखलेलं अंतर, संयम..
आणि कालांतराने..
एकमेकांच्या अपूर्णत्वातच पूर्णत्व असल्याचा होत असलेला साक्षात्कार...
ही हरेक गोष्ट येते..

ह्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख असलेलं एकतरी गाणं आहे का???
नसलंच तर कधी बनेल???
आकर्षक वेष्टनात बांधलेली वस्तू टिकाऊच असेल याबद्दल कोणी खात्री द्यावी???
मखमली, रंगबिरंगी शब्दांनी रंगवलेल्या या गाण्यांमधल्या प्रेमाचा रंग कधी उडेल याचीही guarantee कोणी द्यावी???

म्हणूनच..
जमेल तसे प्रेम करत राहावे...
जमेल तशी त्याची व्याप्ती शोधत राहावी..
तोपर्यंत ’चाहत ना होती..कुछ भी ना होता’ सारख्या पाटया टाकत राहाव्या..
’चाहत पुजा
चाहत दर्शन’
ऐकून हताश न होता ’असं का?...असेल बुवा’ करत हसून निभवावं...
आणि पाडगावकरांना edit करून म्हणावं..
प्रेम म्हणजे same का कधी असतं???
एकाचं दुसरयासारखं कधीच नसतं..
आमच्यासारखं तुमचं नसलं तरी...
आमच्यासाठी ते एकदम ’युनिक’ असतं..

5 comments:

केदार said...

आपण खुप सुंदर लिहीत आहात. आपल्याला माझ्यातर्फे शुभेछा.

कोहम said...

chaan....mazya blog var me asach kahisa lekh lihila hota kuthalya Vday la...mhanaje prem hyav ni prem tyav.....punha ekada vachun baghayala pahije me upamanchya patya takalya hotya ka artha hota tyat kahi...

Abhijit Bathe said...

श्रद्धा - लेखाची सुरुवात अल्टिमेट होती!
गाणं नक्कीच समीरचं असणार!! :))

छोटा डॉन said...

Mast lihit aahes ...
Lihit rahaa ... Aamahi vachat rahu ..

Amol said...

chhan lihites!!!

 
Designed by Lena